कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले.
राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कुडाळमध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०१८चे आयोजन करण्यात आले होते. पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी असल्याने यंदा या ग्रंथोत्सवात ‘पुलं... वाचलेले... पाहिलेले... अनुभविलेले...’ या विषयावर आचरे येथील सुरेश ठाकूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
‘‘पुलं’ म्हणजे १०० वर्षांपूर्वी जन्मलेले आणि १८ वर्षांपूर्वी कालवश झालेले असे व्यक्तिमत्त्व, की कित्येक पिढ्या त्यांना आपले लाडके व्यक्तिमत्त्व म्हणूनच मिरवीत आहे. आम्हा असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमस्वरूपी ‘पुलं’साठीच राखून ठेवलेला आहे,’ असे ठाकूर म्हणाले. ४३ वर्षांपूर्वी आचरे येथे श्री देव रामेश्वराच्या त्रिशतक महोत्सवात ‘पुलं’ आणि सुनीताबाई आले होते आणि आठ दिवस आपल्या मित्रपरिवारासहित राहिले होते. त्या वेळच्या अनेक आठवणी ठाकूर यांनी जागविल्या.
‘ज्या माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला मनमुराद हसविले, हसता हसता विचार करायला भाग पाडले, अक्षय आनंदाचा ठेवा मराठी माणसाला प्रदान करून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविले, तो माणूस आणि त्याचा परिवार आम्ही आचरेवासीयांनी आठ दिवस अनुभवला. त्या साऱ्या ‘पुलकित’ दिवसांचे आम्ही साक्षीदार आहोत,’ असे ठाकूर म्हणाले.
(त्या आठवणी जागविणारा सुरेश ठाकूर यांचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ठाकूर यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. किशोर वालावलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
(सुरेश ठाकूर यांचे ‘शतदा प्रेम करावे...!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)